काही तांत्रिक अडचणी असल्या तरी एनआरसीचा डाटा सुरक्षित
नवी दिल्ली – अधिकृत वेबसाईटवरून एनआरसीची यादीच गायब झाल्याचे लक्षात आले आहे. तथापी आसामात करण्यात आलेल्या एनआरसीच्या तपशीलाबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या असल्या तरी हा डाटा पुर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला आहे. सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून एनआरसीची नागरीकांची अंतिम यादी काढून टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विविध शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्या अनुषंगाने गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की या यादीच्या संबंधात काहीं तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ती यादी वेबसाईटवर दिसत नसली तरी त्या अडचणींचे लवकरच निराकरण केले जाईल.
नागरीकत्वांचे ज्यांचे पुरावे ग्राह्य धरण्यात आले आहेत त्यांची यादी आणि ज्यांची या यादीतून नावे वगळण्यात आली आहेत त्यांचीही यादी वेबसाईटवर गेल्या दोन दिवसांपासून दिसेनाशी झाली आहे. ज्यांची नावे या नागरीकत्वाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांना तशी सर्टिफिकेट्स अजून जारी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अनेक जण ही यादी संगणकावर शोधत होते. त्यांना ही यादीच गायब झालेली दिसल्याने त्यांनी अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या.
एनआरसीचे स्टेट समन्वयक हितेश देव शर्मा यांनी सांगितले की ही यादी आता ऑफलाईन दिसत असली तरी त्या मागे कोणताहीं गैर हेतू नाही. या डाटासाठी विप्रो कंपनीकडून क्लाऊड पुरवण्यात आला आहे. त्यांचे या विषयीचे कंत्राट गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरलाच संपले आहे. ते अजून रिन्यु करण्यात आलेले नाही. त्यामुळे विप्रो कंपनीने 15 डिसेंबर पासून हा डाटा काढून टाकला आहे असे शर्मा यांनी सांगितले. येत्या दोन तीन दिवसांत हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यु केले जाईल आणि त्यानंतर ही यादी पुन्हा दिसू शकेल असेही शर्मा यांनी सांगितले.