पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेत आतापर्यंत 3 विषयांमध्ये 151 कॉपी बहाद्दर आढळून आले. यात सर्वाधिक नाशिक विभागात 35 कॉपीची प्रकरणे आढळली.
मुंबई, कोकण विभागात एकही कॉपीचा प्रकार नाही
आतापर्यंत पुणे विभागात 27, नागपूर 21, औरंगाबाद 20, कोल्हापूर 4, अमरावती 10, नाशिक 35, लातूर 34 कॉपीची प्रकरणे आढळून आली आहेत. मुंबई व कोकण विभागात एकही कॉपीचा गैरप्रकार आढळून आलेला नाही.
राज्यातील विविध नऊ विभागीय मंडळांमार्फत 18 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावी परीक्षेस सुरुवात झाली. येत्या 18 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. राज्यमंडळाने परीक्षेतील कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
इंग्रजीच्या पेपरला राज्यात 82 विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्यानंतर मराठी भाषेसह इतर भाषा विषयांत 53 विद्यार्थी कॉपी करताना आढळले. हिंदीच्या पेपरला 16 विद्यार्थ्यांनी कॉपी केली. तीन पेपरचा विचार करता सर्वाधिक कॉपीचे गैरप्रकार इंग्रजीच्या पेपरमध्ये आढळून आले.