Marathi Language: राज्यात परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे (महाराष्ट्र दिन)पासून मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोटार परिवहन विभागामार्फत राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांतून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान संबंधित चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही सरनाईक यांनी दिला आहे. हेही वाचा – सम्राट चौधरी यांचा RJD पासून BJP पर्यंतचा प्रवास; उद्या सकाळी 11 वाजता घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ सरनाईक यांनी सांगितले की, रिक्षा किंवा टॅक्सी परवाना देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांत अनेक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही किंवा काही जण जाणूनबुजून मराठी बोलणे टाळतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. “ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान जितका आवश्यक आहे, तितकाच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर १ मेपासून सर्व परवानाधारक चालकांना मराठी लिहिता व वाचता येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.