“लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी। “, हो मराठी बोलतो किंबहुना ती बोललीही जाते; परंतु वर्षभरातून फक्त एक दिवसच म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी. हो त्याला कारणही तसेच आहे. अगदी जगभरातील मराठी भाषकांकडून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस “मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. जागतिक मराठी अकादमीने याकामी पुढाकार घेतला.
कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दल आजच्या पिढीला ठाऊक नसल्यामुळे कदाचित हाच दिवस, “मराठी भाषा दिवस’ म्हणून का साजरा करायचा, असा एक साधा प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी दडलेला असतो. खरंतर कवी कुसुमाग्रज यांचा व्यासंग इतका मोठा आहे की त्यांच्याबद्दल काय बोलावे. विष्णू वामन शिरवाडकर हे एक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार होते. त्यांची नटसम्राट, दुसरा पेशवा ही गाजलेली नाटके तसेच कल्पनेच्या तीरावर, जान्हवी या कादंबऱ्या आणि किनारा, विशाखा, मराठी माती हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. यापैकी ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे कायमचे भूषण आहे. शिवाय 1964 मध्ये गोव्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले होते. कुसुमाग्रजांना मराठी भाषेतील साहित्याचा “कोहिनूर’ म्हणूनही संबोधले जाते.
अनेक मराठी भाषिक, मराठी भाषा दिवस साजरा करतात खरा; परंतु खूप क्वचित जणांनाच हे ठाऊक असेल की, जगभरातील बऱ्याच भाषांचा उगम हा जसा संस्कृत भाषेपासून झाला आहे, तशीच आपली मराठी भाषादेखील संस्कृत भाषेमधून आली आहे. लहान मूल जेव्हा जन्माला येते, तेव्हा आपल्या आईची, आपल्याला सभोवताली असलेल्या भाषेची त्याला ओळख होते, त्या भाषेचे त्याच्यावर संस्कार होतात. महाराष्ट्रातील बहुतांश लोकांची मराठी भाषा ही मायबोली आहे. सर्व महाराष्ट्राची मराठी भाषा एक असली तरीही मराठी भाषा दर बारा कोसावर बदलते. प्रत्येक प्रांताची निराळी भाषा आहे. लेखी भाषा तीच; परंतु बोलीभाषेत फरक जाणवतो. मराठी भाषेतसुद्धा वेगवेगळे प्रकार जाणवतात, जसे की कोकणची कोकणी भाषा, घाटावरची व देशामधील वेगळी भाषा, गोव्याकडची कोकणी भाषा वेगळी असते.
मराठी भाषा ही लवचिक आहे. थोड्या थोड्या फरकाने ती वेगळी भासते. अलीकडे मराठी भाषा ही शुद्ध मराठी भाषा राहिली नाही.
त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषाही मिश्रित झाली आहे. अनेक खेड्यांमध्ये रोज बोलली जाणारी मराठी भाषा ही जरी अशुद्ध आणि रांगडी असली, तरीदेखील कुठेतरी ती भाषा आपली वाटते. एक आपलेपण जाणवते त्यामध्ये. अलीकडे मराठी भाषा बोलली जाते; परंतु त्यामध्ये हिंदी किंवा इंग्रजी शब्द वापरले जातात. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी हे लोक परदेशात जातात आणि त्या देशातील बोलीभाषेलाच आपली मातृभाषा समजून अगदी मायदेशी परतल्यावरही त्याचा सर्रास वापर करतात. कुठेतरी इंग्रजी भाषेचे वर्चस्व मराठी भाषेवर प्रस्थापित झालेले दिसून येते. त्यामुळेचं आज समाजामध्ये मराठी भाषेला प्रतिष्ठित भाषेचा दर्जा अजूनही मिळाला नाही. मराठी भाषा खूप कमी प्रमाणात बोलली जाते आणि हे असेच चालू राहिले तर मराठी भाषा बोलीभाषेतून हळूहळू विभक्त व्हायला फारसा वेळ नाही लागणार, म्हणूनचं. “मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.’
मराठी भाषा ही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून प्राप्त झाली आहे. “मराठी भाषा’ ही खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या महाराष्ट्राला, मराठी साहित्याला खूप मोठा इतिहास आहे. याचं मराठी भाषेने आपल्याला कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, शांता शेळके, केशवसुत यांसारखे अनेक कवी, वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे यांच्यासारखे लेखक दिले. मराठी साहित्य खूप मोठे आहे. त्याची ओळख करून घेणे व आजच्या पिढीला ओळख करून देणे गरजेचे होत चालले आहे. केवळ आपल्या बोलण्यातून नव्हे, तर आपल्या आचारातून आणि विचारांमधून देखील मराठी भाषा दिसायला हवी. तरच मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि ही जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे. तरुण पिढी परदेशांत उच्च शिक्षणासाठी जाते, तिथे जाऊन त्यांनी तिथली बोलीभाषा जरूर शिकून घ्यावी; परंतु आपली मायबोली मराठी भाषा ही बोलावी. जेणेकरून ती समृद्ध होईल. परदेशातून परत येताना मराठी भाषेचा विसर पडता कामा नये.
“ने मजसी ने तु परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला, सागरा!”
असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश आहे. परदेशी जाऊन ही आपली मायबोली, मराठी भाषा आणि आपल्या देशावर एवढे प्रेम करणारे लोक आपल्या याचं महाराष्ट्राने आपल्याला दिले आहेत. म्हणूनच मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करून, तिला पुन्हा एकदा समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आता आपली आहे.
उठा चला, उठा चला, जागर करूया सारे.
मराठी आमुची मायबोली, मराठी आमुची शान.
एकसुराने गाऊया त्याचे गुणगान..!!