मुंबई – पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून ‘बलोच’मध्ये प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठ्यांना गुलामगिरी पत्करावी लागली. मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या नजरेत मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे तर मराठ्यांवर अत्याचार करणारा अफगाणी आहे.
पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. ”बलोच ही एक सकारात्मक गोष्ट आहे. यापूर्वी आपण पानिपतबद्दल ऐकले आहे, ते केवळ पराभवाबद्दलच आहे.
मात्र पानिपतच्या युद्धानंतर जेव्हा गुलामीच्या अवस्थेत असताना पुन्हा एकत्र येणे, संघर्ष करणे, ही गोष्ट प्रामुख्याने दाखवण्यात आली आहे. पानिपतचे युद्ध हे पराभव नसून शौर्य होते. हा चित्रपट पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.