Maratha Reservation – विधानसभेत आज (दि.१०) बुधवारी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत उचलून धरला.
आमदार अमित साटम यांनी विरोधकांना मराठा आरक्षणाचे काही पडले नाही. त्यांना त्यांचे राजकारण करायचे आहे, असा आरोप करत विधानसभेचे वातावरण तापवले. विरोधकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. जवळपास या गोंधळामुळे तीन वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिवसभरासाठी विधानसभा तहकूब करण्यात आली.
यामुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, राम कदम यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विधानसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी यावेळी बोलण्याचा प्रयत्न केला पण गदारोळ वाढला आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आरोपाच्या फैरी झडत होत्या. त्यावेळी विरोधकांकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा सांभाळला.
सत्ताधारी स्वत:चे पाप लपवण्यासाठी हा गोंधळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार पलटवार केला. राज्यात जो मराठा विरूद्ध ओबीसी हा वाद पेटवला जात आहे त्या पापात सर्वात मोठा वाटा महायुतीचाच असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी एकच खळबळ उडवून दिली.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच लोकांना झुलवत ठेवणे हे विरोधकांचे काम आहे. पण आता ते शक्य नाही असे म्हणत त्यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला.
बैठकीला जाण्यापासून रोखणारं कोण?
यावेळी आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडीचे नेते पहिल्यांदा सर्वपक्षीय बैठकीला येणार होते. पण ते या बैठकीला आले नाहीत. अचानक हा निर्णय का झाला? बैठकीला जाण्यापासून रोखणारे कोण होते?
ऐन वेळी कोणाचा निरोप आला? या प्रश्नांची उत्तरे विरोधकांनी द्यावी असे शेलार म्हणाले. शेलारां पाठोपाठ राम कदम, संजय कुटे, नितेश राणे यांनी विरोधकांची कोंडी केली.