मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अशाच एका कारणामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतआहेत. उस्मानाबादमध्ये ‘हिंदू गर्वगर्जना संवाद’ यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली.
यात्रेदरम्यान, आरक्षणासंदर्भात बोलताना सावंत यांनी,” तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली,” अशा शब्दांमध्ये विरोधकांवर टीका केली. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील असा शब्दही सावंत यांनी दिला. मात्र विरोधकांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेले वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उस्मानाबादमधील हिंदूगर्वगर्जना कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी सावंत यांनी संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक राजकारण करत असल्याचा आरोपदेखील सावंत यांनी केला. “आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे अशा मागण्या होत आहेत. अहो हे कोण आहेत? याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे तुम्हा-आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही,” असे म्हणत सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, “दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच” असेही म्हटले. “आम्हाला आरक्षण पाहिजेच. मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय,” असे मराठा सामाजातील नेते असणाऱ्या सावंत यांनी म्हटले आहे. “आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री २०२४ च्या आत आपल्याला पाहिजे तसं, टिकावू आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. हे वचन तुम्हाला देतो,” असेही सावंत यांनी भाषणादरम्यान म्हटले.