मुंबई – राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले आक्रमक झाले आहे. त्यांनी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. रायगडावरून कोल्हापुरात मराठा मोर्चा काढणार असल्याची भूमिका घेतली. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावर चालढकल करू नका, अन्यथा पुढाकार घेणाऱ्यांना भाजपचा पाठिंबा असेल, असा इशारा संभाजीराजे यांना दिला.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण व संभाजीराजे यांच्या भूमिकेवर भाष्य केले. पाटील म्हणाले, खासदार संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार तर दुसऱ्यावेळी लाँग मार्च काढणार अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे १६ जूनला कोल्हापुरमध्ये मराठा मोर्चा निघणार का, याची शाश्वती देता येत नाही. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे, असंही पाटील यांनी सांगितलं.
संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला या मोर्चाला माझा पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यांनी आपल्या निर्णयावरून माघार घेतली, तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. दुसऱ्या कुणीही कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला तर त्याला भाजप पाठिंबा देईल, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळ निघून गेली तर समाजाचं नुकसान होईल. संभाजीराजेंच्या भूमिकेमुळं सरकारला पळवाट तर मिळणार नाही ना, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी नमूद केले.