मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज महाअधिवेशन पार पडत असून यावेळी नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. नवीन झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, यावर काही मराठा संघटनांनी राजमुद्रेच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. मराठा संघटनेचे विनोद पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजमुद्रेचा वापर काही राजकीय पक्ष करु इच्छितात. राजमुद्रा एक वैशिष्ट आहे की, त्या राज्याची अधिकृततची झालर असते. राजमुद्रेचा वापर करणे म्हणजे गैरकृत्य आहे. एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका कोणत्या घटकाला पटली नाही तर त्या राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलन होतात, झेंड्याची जाळपोळ होते. निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते उत्साहाच्या भरात जमेल तिथे झेंडे लावतात नंतर ते झेंडे निवडणूक अधिकाऱ्यांकडून उतरुन डंम्पिंग ग्राऊंडला फेकतात, असे त्यांनी सांगितले आहे.
शिवभक्त राजमुद्रेचा अशाप्रकारे अवमान होताना पाहू शकत नाही. त्यामुळे भविष्यातील उदभवणारे वाद टाळण्यासाठी राजमुद्रा वापरण्याची परवानगी देऊ नये. तसेच तामिळनाडू सरकारने १८ नोव्हेंबर १९५७ रोजी कायदा केला तशाप्रकारे राजमुद्रेचा समावेश The Prevention of Insult To National Honor 1971 यामध्ये करावा व केंद्राला शिफारस करावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.