नाशिक – मी स्वतः आणि सरकार दोघेही मराठा समाजासोबत आहे. काही लोक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून ते योग्य नाही. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही. आज मराठा आणि ओबीसी समाज अडचणीत आहेत, असे नाशिकचे पालकमंत्री छनग भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये मराठा समाजाचे आज मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनास छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी मराठा आंदोलकांना संबोधित करताना छगन भुजबळ बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, नाशिकमध्ये होणाऱ्या मूक आंदोलनाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बोलणे झाले आणि मी त्यांना ताबडतोब होकार दर्शविला. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. तसेच इतर पक्षांचीही हीच भूमिका आहे, या भूमिकेशी मी देखील एकनिष्ठ आहे.
काही लोकांचे म्हणणे आहे की, ओबीसींचे आक्रोश मोर्चे सुरु झाले. ते मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आहेत, असे अजिबात नाही. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही. हे दोन्ही समाज आज अडचणीत आहे.
मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आणि ओबीसींच्या असलेल्या आरक्षणावरही गदा आणली. कायद्याच्या कचाट्याट सापडल्यावर या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ओबीसी समाजाचे म्हणणे आहे की, आमचं आरक्षण वाचवा. पण काहीजण दोन्ही समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर केला.
आपलं उद्दिष्ट एकमेकांसोबत भांडण्याचे नाही. तर आपले उद्दिष्ट राज्य सरकारला घेऊन, केंद्र सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करुन घेणे आहे. मराठा, ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयात लढताना केंद्र सरकारची नितांत गरज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राची गरज आहे आणि ओबीसी आरक्षणासाठीही आहे. आपण एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.