मुंबई – मराठा नेत्यांनी आरक्षणाविषयी संयम बाळगावा, गोंधळ अधिक वाढल्यास राज्यातील आरक्षणही गमवायची वेळ येऊ शकते, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
पुण्यामध्ये आज पत्रकारांनी आंबेडकर यांना, ओबीसी समाजानं मोठं मन करुन मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करुन घ्यावं, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे, याबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना आंबेडकर यांनी, ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठा नेत्यांनी पडू नये असा सल्ला दिला.
ते म्हणाले, “मी जे काही सोशल मीडियावर वाचतोय त्यावरुन हेच दिसतंय की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र आमच्या ताटातलं नको, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे माझं सर्व मराठा नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी हा वाद अधिक गुंतागुंतीचा करु नये. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठा नेत्यांनी पडू नये.”
मराठा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित
“मराठा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी मराठा समाज १६ टक्के असला तरी देशात तो फक्त २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी जर एकत्र आले तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरतं मिळणार आरक्षण आहे तेही मिळणार नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या एका स्टे ऑर्डरने मराठा समाजाने घाबरुन जाऊन नये,” असंही आंबेडकर यांनी म्हंटलं.
निकाल मराठा समाजाच्याच बाजूने लागेल
यावेळी बोलताना आंबेडकर यांनी, “मराठा आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीला आल्यास मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्ट कायम ठेवेल त्यामुळे निकाल मराठा समाजाच्याच बाजूने लागेल.” असा विश्वास देखील व्यक्त केला.