मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मी अयशस्वी व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे माझ्या यशात अनेकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, असा धक्कादायक खुलासा माजी कसोटीपटू व भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.
शास्त्री यांची 2017 साली भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी हे पद गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वकरंडकापर्यंत सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. मी हे पद स्वीकारले तेव्हापासून इतरांच्या मताला महत्त्व देणे मी थांबवले. भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सत्राची अंतिम फेरी गाठली. भारताने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली. मात्र, अनेकांना माझे हे यश बघवले नाही, असे परखड मत शास्त्री यांनी व्यक्त केले.
भारतात तुम्ही एखाद्या क्षेत्रात अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. मी राष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे मी यशस्वी झालो हे अनेकांना पचले नाही. मी इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यास शिकलो, असे शास्त्रीही म्हणाले.
भारतीय संघ परदेशात यशस्वी ठरावा, हे प्रशिक्षक म्हणून माझे मुख्य उद्दिष्ट होते. सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन सांघिक कामगिरी करणे गरजेचे असून, कोणत्याही खेळाडूला वेगळी, खास वागणूक मिळणार नसल्याचे मी प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर स्पष्ट केले होते. खेळाडूंना तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देण्याची मी सूचना केली. तसेच खेळाडूंना आक्रमक शैलीत आणि निर्भीडपणे खेळण्यास सांगितले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तुम्हाला स्लेजिंग केले तर त्यांना तसेच उत्तर द्या, असेही मी खेळाडूंना सांगितले होते, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.