सोरतापवाडी- करोना व्हायरसमुळे देशात मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळेच या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पूर्व हवेलीतील ऊरूळी कांचन,कदमवाकवस्ती व म्हातोबाची आळंदी येथे जनता कर्फ्यू लागू करून कडकडीत बंद पाळण्यात आला. कदमवाकवस्ती येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी सहकार्य केल्याची माहिती सरपंच गौरी गायकवाड यांनी दिली. म्हातोबाची आळंदी येथे तीन दिवस “जनता कर्फ्यू’ सुरू आहे.
उरुळी कांचन येथे आठवड्यातून मंगळवारी (दि. 7) “जनता कर्फ्यू’ ठेवल्याची माहिती सरपंच राजश्री वनारसे व उपसरपंच जितेंद्र बडेकर यांनी दिली. सरपंच वनारसे, उपसरपंच बडेकर, ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी, तलाठी प्रदीप जवळकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम, सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी व अन्य सदस्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. गावांमध्ये जंतूनाशक औषध फवारणी सुरू आहे. सात हजार कुटुंबांना हायपो क्लोराइड हे औषध प्रत्येकी एक लिटरप्रमाणे घरोघरी जाऊन वाटण्यास सुरुवात केली आहे.