नागपूर : नागपूरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावावा आवरताना पोलिस आणि नागरिक जखमी झाले असून नागपूरमध्ये तणाव वाढला आहे. परिणामी, काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, नागपूर जिल्हा प्रशासनाने शाळांना स्वातंत्र्य दिले असून, त्यांनी परिस्थितीनुसार स्वतःचा निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्यात ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अचानक औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वक्तव्ये केली होती. त्यावरुन राजकारण सुरु असताना काल (दि. १७) नागपूरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता. या मोर्चात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता.
त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा तणाव निवळला. परंतू सायंकाळी पुन्हा दोन गटात महाल परिसरात दगडफेक सरु करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने दोन जेसीबी जाळण्यात आल्या. या दगडफेकीत १० ते १५ पोलिसही जखमी झाले आहेत.
हंसपुरी भागातही 20 ते 22 वाहनांची तोडफोड
नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही भागात जमावबंदी लागू
या घटनेनंतर पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन सुरु केलं असून 80 जणांना अटक केली आहे. आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.