मागणी तेथे सेतु केंद्र देण्याची मागणी
नागरिकांवर तालुक्याच्या ठिकाणी येण्याची वेळ
शेवगाव -नागरिकांना विविध कामासाठी आवश्यक असणारे दाखले त्यांच्या सोयीच्या ठिकाणी उपलब्ध व्हावेत, म्हणून ठिकठिकाणी सेतू सुविधा केंद्र (हल्लीचे आपले सरकार सेवा केंद्र) सुरू करण्यात आले. मात्र यातील अनेक सेतू कार्यालये परवान्याच्या ठिकाणी चालविण्यात येत नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
खेड्या पाड्यातील, वाडीवस्तीवरील शेतकऱ्यांना वेळोवेळी लागणारा सातबारा, आठ अ, शेतकरी, वारस, हयातीचा, भूमिहीन, ओबीसी, तसेच शैक्षणिक व अन्य कामासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवासी व राष्ट्रीयत्वाचे दाखले, नॉनक्रिमिनल, महिलांचा 30 टक्के, आर्थिक दृष्ट्या मागास दाखला, पॅन कार्ड, व आधार कार्ड व त्यातील दुरुस्त्या, विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे तसेच अनेक दाखले जनसामान्यांना वरचेवर या -ना त्या कामासाठी हवे असतात. नागरिकांना ते सहजासहजी उपलब्ध व्हावेत, प्रत्येक वेळी तालुक्याच्या गावी चकरा मारण्याची वेळ येऊ नये, म्हणून ज्या त्या महसुली मंडलाच्या गावी मंडलनिहाय सेतू कार्यालये देण्यात आली. त्यामागे मोठा इतिहास आहे.
महा-ई-सेवा केंद्रचे भाजप शासनाने नामकरण आपले सरकार सेवा केंद्र असे केले.सध्या शेवगावमध्ये पाच अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र असून तालूक्यात देवटाकळी, शहर टाकळी, भाविनिमगाव, दहिगावने, ढोरजळगाव, वाघोली, चापडगाव, बोधेगाव, बालमटाकळी, हातगाव, कांबी, मुंगी, वरुर, हसनापूर, अमरापूर, आव्हाणे, भातकुडगाव, शिंगोरी अशी एकूण 23 आपले सरकार सेवा केंद्र आहेत. याशिवाय सत्तर ग्रामपंचायतीमध्ये दोन वर्षापासून सेतु कार्यालयाची सुविधा आहे. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरनेही तालुक्यात 27 केंद्रांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आज तालुक्यात 120 सेतू सुविधा केंद्र असूनही नागरिकांची अडचण कायम आहे.
कारण यातील बहुतेक कार्यालये परवान्याचे ठिकाणी न चालवता ती तालुक्याच्या ठिकाणी चालवली जातात. बहुतेक सेतू केंद्राची गर्दी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या आसपास एकवटलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी जशा होत्या, तशाच राहिल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारण्याची पाळी येते. त्यातील काही सेतू केंद्र कागदोपत्री मंडळनिहाय चालूही असतील, पण प्रत्यक्षात ती तालुक्याला असल्याचे चित्र आहे.
किमान मागणी असेल तिथे सेतु केंद्राची परवानगी देण्यात यावी. एरंडगाव महसूल मंडल अंतर्गत खानापूर, कऱ्हेटाकळी, रावताळे, कुरुडगाव, गदेवाडी, नजीक बाभूळगाव, दहीफळ नवे व जुने लाखेफळ या गावांसाठी खानापूर येथे सेतू कार्यालयाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनीही या मागणीसाठी जोर लावला आहे. औरंगाबाद बारामती या राज्यमार्गावरील खानापूर हे या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी सोयीचे केंद्र होऊ शकते. मंडलनिहाय आढावा घेतल्यास अशी अनेक गावे निघतील, तेथे आपले सरकार सेवा केंद्र सुरू होऊ शकतील व अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.