कोपरगाव – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केव्हा पडते आणि पुन्हा निवडणुका कधी लागतात, यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहे. मात्र सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे घेत असलेले निर्णय पाहता महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, असा टोला आ. आशुतोष काळे यांनी लगावला.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रुती वढणे होत्या. नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नानासाहेब जाधव, जि. प. सदस्य राजेश परजणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते विरेन बोरावके, सतीश कृष्णाणी, सुभाष दवंगे, ऍड. जयंत जोशी, डॉ. गोवर्धन हुसळे, डॉ. अजय गर्जे, ऍड. नितीन पोळ, डॉ. मयूर जोर्वेकर, अशोक खांबेकर, मौलाना मिल्ली, संतोष गंगवाल व्यासपीठावर उपस्थित होते. आ. काळे म्हणाले, शहराच्या नागरिकांना निवडणुकीपूर्वी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार या तलावाचे खोदाई काम सुरु केले आहे. शहरातील भूमिगत गटारी, रस्ते दुरुस्ती, रस्ते सुशोभीकरण आदी कामांसाठी दोन कोटी 19 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. शहराची बाजारपेठ फुलविण्यासाठी व विस्थापित टपरी धारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा मानस असल्याचे बोलून दाखवत कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देवून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.