कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून भासवण्याचा लष्कर ए तोयबाचा प्लॅन होता
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी लिहीलेल्या “लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकामध्ये अनेक महत्वाच्या विषयांवरील गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. राकेश मारिया यांनी शीना बोरा खून प्रकरणाच्या तपासाच्या वादात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
तर तत्कालीन पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांच्यावर शीना बोराचे सावत्र वडील पीटर मुखर्जी यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती लपवल्याचा, तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फडणवीसांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतातील रहस्ये आणि राजकीय लागेबांधे याबाबत या पुस्तकामुळे भूकंप होण्याची शक्यता आहे.
अजमल कसाब हा हिंदू होता आणि 26/11 चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद होता असे लष्कर ए तोयबाला सिद्ध करायचे होते. “कसाबच्या हाती हिंदू धर्मातील धागा बांधण्यात आला होता. त्याची ओळख बदलण्यात आली होती. समीर दिनेश चौधरी असे नाव त्याला देण्यात आले होते.
लष्कर-ए-तोयबाला 26/11 चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांनी केला आहे असे सिद्ध करायचे होते. कसाबला जागीच मारले असते तर असंच घडले असते, असेही मारिया यंच्य पुस्तकात म्हटले आहे.
एवढंच नाही तर राकेश मारियांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या उल्लेखाप्रमाणे 26/11 च्या हल्ल्याचे कनेक्शन दाऊदसोबतही होते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था “आयएसआय’ आणि जैश ए मोहम्मद यांना कसाबला संपवायचे होते. त्यामुळे दाऊदला कसाबची सुपारी देण्यात आली होती, असेही पुस्तकात म्हटले आहे.