नगर – भाजपमध्ये सध्या अस्वस्थता आहे. भाजपचे अनेक नेते कॉंग्रेस, शिवेसना, राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते आमचे भविष्यात सहकारी होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमात आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यावेळी व्यासपीठावर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यावर मंत्री थोरात म्हणाले, भाजपाच्या गोटात प्रचंड नैराश्य आहे. अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. ते भाजप सोडून आघाडीतील कुणाकडेही जाऊ शकतात आणि आमचेही सहकारी होऊ शकतात.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचक विधानाबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून ते अशीच भविष्यवाणी करीत आहेत. आघाडीला मात्र कसालाही धोका नाही. येणारी तीन वर्ष आघाडी सरकार मजबूत राहील. त्यापुढे ही एक राहू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जीएसटी परिषदेच्या पेट्रोल, डीझेलच्या निर्णयाबद्दल विचारले असता ते म्हणाले, की त्याचा परिणामांचा विचार केंद्र आणि राज्य म्हणून झाला पाहिजे. राज्यांना जीएसटी मधून किती हिस्सा मिळणार हे समजले पाहिजे. केंद्राने राज्याचे तीस-चाळीस हजार कोटी जीएसटीचे न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार, करोना उपाययोजना यासाठी पैशाच्या अडचणी आहेत.