नवी दिल्ली: देशभर गाजलेल्या 1999 सालच्या जेसिका लाल हत्या प्रकरणातील दोषी मनू शर्मा याची काल तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली. जेसिका लाल हत्येप्रकरणी 16 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याची सुटका करण्यात आली. शिक्षेच्या आढाव्यासाठीच्या मंडळाकडून मनू शर्माच्या सुटकेची शिफारस करण्यात आली होती.
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी या शिफारसीला मंजुरी दिल्यावर काल त्याची तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली. सिद्धार्थ वसिष्ठ असे मनू शर्माचे मूळ नाव आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेही “सेन्टेन्स रिव्ह्यू बोर्डा’ला मनू शर्माच्या सुटकेचा विचार करण्याबाबत सूचना केली होती. “सेन्टेन्स रिव्ह्यू बोर्ड’ची 11 मे रोजी बैठक झाली. त्यामध्ये मनू शर्माच्या सुटकेची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्याच्या सुटकेच्या शिफारसीला नायब राज्यपालांनी मंजुरी दिल्याचे ऍड. अमित साहनी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
कॉंग्रेसचे माजी नेते विनोद शर्मा यांचे चिरंजीव असलेल्या मनू शर्मा याला जेसिका लालच्या हत्येच्या आरोपात दोषी ठरवले गेले होते. 29 एप्रिल 1999 रोजी दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागातील कुतुब कोलनॅडमधील तमारिंद कोर्ट रेस्टॉरंटमध्ये मद्य देण्यास नकार दिल्याने मनू शर्माने जेसिका लालची हत्या केली होती. या हत्येसाठी मनू शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यापैकी 16 वर्षे 11 महिने आणि 24 दिवसांची शिक्षा त्याने भोगली आहे. तर 23 वर्षे 4 महिने आणि 22 दिवसांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. त्याला 12 वेळा पॅरोल आणि 24 वेळा फर्लो मंजूर करण्यात आला आहे.