मुंबई – अँटिलिया प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरूनच मनसुख हिरनची हत्या केली, असा जबाब या प्रकरणातील दोन आरोपींनी दिल्याचा दावा NIA ने विशेष न्यायालयात केला आहे.
प्रदीप शर्मा यांनी सचिन वाझेसोबत एकत्र येऊन स्फोटक प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अँटिलिया प्रकरणातील आरोपी शर्मासह, संतोष शेलार आणि सुनील माने यांना विशेष न्या पी आर सित्रे यांनी ता. 25 पर्यंत एनआयए पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तवेरा कारमध्ये सतीश उर्फ टन्नी भाई आणि मनीष सोनी यांनी शेलार आणि मानेसह हिरनची. हत्या केली आणि ठाणे खाडीमध्ये म्रुतदेह फेकून दिला, असा जबाब शेलार आणि मानेने दिला आहे, असे एनआयएकडून सांगण्यात आले आहे.
प्रदिप शर्माला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली तर सतीश आणि मनीषला मागील आठवड्यात अटक झाली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून शर्मा आणि वाझे पोलीस दलात ओळखले जातात. आतापर्यंत या प्रकरणात दहाजणांना अटक झाली आहे.
मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. हा संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचं उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ त्याला मदत करणाऱ्या रियाज काझी या पोलीस अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माली अटक करण्यात आली होती.