मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या अंटालीया या निवासस्थानाच्या बाहेर 20 जिलेटीन कांड्या असणारी स्कॉर्पिओ आढळल्याने खळबळ उडाली होती. सध्या मनसुख यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी मनसुख यांच्या मालकीची असल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती.
त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले आहे या मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे.
या पत्रात मनसुख हिरेन यांनी लिहिले आहे की,’ या घटनेनंतर मला सतत विक्रोळी पोलीस ठाणे तसेच नागपाडा एटीएस यांच्याकडून सतत चौकशीसाठी फोन आले. त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. यादरम्यान बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणात मी संशयित असल्याचं सांगितलं. या सततच्या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ बिघडलं. माझी आणि माझ्या कुटुंबाची पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी पत्रातून केली.