नवी दिल्ली : मनमोहन सिंग, बाळ ठाकरे, मुलायम सिंह, राजनाथ सिंह गुण्यागोविंदाने एकाच घरात राहत असल्याचे सांगितल्यास सगळेच अचंबित होतील. पण, ते खरे आहे. उत्तरप्रदेशातील एका शेतकऱ्याच्या घरात ते राहतात.
सध्या विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या उत्तरप्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यात हैदराबाद नावाचे गाव आहे. त्या गावात मिठाई लाल (वय 57) नावाचा शेतकरी राहतो. त्याला सात अपत्ये आहेत. त्या सर्वांना मिठाई लालने राजकीय नेत्यांची नावे दिली. अन्य दोन मुलांची नावे ग्यानी झैलसिंग आणि कल्याण सिंह अशी आहेत.
मिठाई लालची कन्या जयललिताचे 2013 मध्ये निधन झाले. मिठाई लालच्या मुलांची नावे हा गावात नेहमीच चर्चेचा विषय असतो. मुलांना इतरांकडून आदर मिळावा यासाठी त्यांना मिठाई लालने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे दिली.
ग्यानी झैलसिंग फर्निचरचे, तर मुलायम सिंह औषधांचे दुकान चालवतो. कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह कारखान्यांमध्ये नोकरी करतात. तर, मनमोहन सिंग आणि बाळ ठाकरे हे शालेय विद्यार्थी आहेत. मुलांसाठी अतिशय जाणीवपूर्वक हाय-प्रोफाईल नावांची निवड केल्याचे मिठाई लाल सांगतात.
मी स्वत: शाळेत जायचो त्यावेळी वर्गमित्र माझ्या नावाने हसायचे. त्यामुळे मला कसेतरी वाटायचे. माझ्या मुलांची तशी अवस्था होऊ नये म्हणून मी त्यांना महत्वाच्या नेत्यांची नावे दिली, असे ते म्हणतात. मिठाई लाल यांची मुलेही त्यांच्या नावांवर खुष आहेत. नावांमुळे लोक आमची दखल घेतात, असे ते आवर्जून सांगतात.