नवी दिल्ली – नोटबंदीच्या निर्णयाला आज चार वर्ष झाली. त्यानिमीत्त कॉंग्रेसने आज पुन्हा एकदा मोदी सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली. आजच्या दिवसाचे वर्णन कॉंग्रेसने विश्व घाटा दिवस असे केले आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी म्हटले आहे की, नोटबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 24 नोव्हेंबर 2016 रोजी संसदेत बोलताना असे विधान केल होते की, ज्या पद्धतीने ही योजना राबवली गेली आहे, ते एक अपयशाचे स्मारक ठरेल. आणि खरे पहाता हा निर्णय म्हणजे सामान्य माणसांची लूट असून चोरीला दिलेले कायदेशीर स्वरूप आहे असे मनमोहनसिंग यांनी म्हटले होते त्यांचे हे शब्द खरे ठरले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
माकन म्हणाले की, नोटबंदी नेमकी कोणत्या उद्देशाने केली गेली हेच मोदी सरकारपुढे स्पष्ट नव्हते. त्यांनी जे उद्देश सांगितले ते अपयशी ठरत गेल्यानंतर ते नोटबंदीच्या निर्णयाचा उद्देशच सतत बदलत राहिले असे ते म्हणाले.
नोटबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या 99.3 टक्के नोटा सिस्टीम मध्ये परत आल्या, त्यामुळे काळा पैसा बाहेर काढण्याचा सरकारचा उद्देश फसला. नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावाही खोटा ठरला असून भाजपने ठिकठिकाणी आमदार फोडण्यासाठी जो पैसा वापरला हाच भ्रष्टाचाराचा पुरावा ठरला.
नोटबंदी नंतर खोट्या नोटांचाहीं बाजारात सुळसुळाट झाला असून सरकारचा हा उद्देशही असफल ठरला आहे. सध्या देशात रोखीचे व्यवहार वाढले असल्याने सरकारचा कॅशलेस इकॉनॉमिचा उद्देशही साफ फसला आहे.
नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल हा मोदी सरकारचा दावाहीं खोटा ठरला आहे असे माकन यांनी म्हटले आहे. नोटबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद झाले आणि लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यातून देश अजून सावरलेला नाही असेही त्यांनी नमूद केले.