नवी दिल्ली : नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी आपल्या ‘बॅकस्टेजः द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाय ग्रोथ इयर्स’ या पुस्तकात खळबळजनक विधान केले आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2013मध्ये अध्यादेश फाडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग राजीनामा देणार होते, असा खुलासा अहलुवालिया यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2013 मध्ये अध्यादेश फाडल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माँटेकसिंग अहलुवालिया यांना मी राजीनामा द्यावा का? अशी विचारणा केली हाती.
सिंग यांच्या प्रश्नावर अहलुवालिया म्हणाले होते कि, या मुद्दय़ावरून राजीनामा देणे योग्य नाही. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत अहलुवालिया अमेरिकेच्या दौर्यावर होते. 27 सप्टेंबर 2013 रोजी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी कलंकित नेत्यांना वाचवण्यासाठी मनमोहन सरकारने आणलेला अध्यादेश फाडला होता.
या अध्यादेशाविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते कि, हा अध्यादेश आणणे मूर्खपणा आहे. या अध्यादेशाला फाडून फेकायला हवे. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे मनमोहन सरकारची बदनामी झाली होती.
या घटनेचा संदर्भ देताना अहलुवालिया म्हणाले की, पंतप्रधान सिंग यांच्या न्यूयॉर्क दौर्यावरील शिष्टमंडळात मी सामील होतो. तेव्हा पंतप्रधान मनमोहन शिंग यांच्यावर एक टीका करणारा लेख प्रकाशित झाला होता. हा लेख मला आयएएसमधून निवृत्त झालेले माझे बंधू संजीव यांनी ईमेल केला. हा लेख मी तत्कालीन पंतप्रधानांना दाखवला. त्यांनी तो लेख शांतपणे वाचला. थोडा वेळ त्यांनी लेखावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु थोड्या वेळाने अचानक मी राजीनामा द्यावा का? असा प्रश्न त्यांनी विचारल्याचा दावा अहलुवालिया यांनी पुस्तकात केला आहे.