नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून करोनाविरोधी उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणाच्या आकडेवारीवर भर देण्यापेक्षा लोकसंख्येतील लस घेतलेल्या टक्केवारीवर भर द्यावा, असे मनमोहन सिंग यांनी या पत्रात सुचवले आहे.
कोविड-19 च्या विरोधात लढत असताना लसीकरण वाढवण्याच्या मुद्द्यावर भर द्यायला हवा. लसीकरण झालेल्या आकडेवारीच्या मोहात पडण्यापेक्षा लसीकरण झालेली लोकसंख्या टक्केवारी वाढवण्यावर भर द्यायला हवा, असे मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटले आहे.
सध्या देशात फारच छोट्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. पण योग्य धोरण अवलंबल्याने आपण अधिक चांगले आणि वेगाने लसीकरण करू शकतो. करोनाच्या साथीचा मुकाबला करताना आपण अनेक गोष्टी केल्याच पाहिजेत. लसीकरण वाढवणे हा त्यातीलच एक भाग आहे, असेही मनमोहन सिंग म्हणाले.
मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रामध्ये इतर अनेक मुद्दे सुचवले आहेत. त्यामध्ये विधायक सहकार्याची भावना हा एक प्रमुख मुद्दा आहे. आपण या तत्त्वावर नेहमीच विश्वास ठेवला आहे आणि यानुसार आचरणही केले आहे, असेही ते म्हणाले.
कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये करोनाच्या साथीशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे.
करोनाविरोधी लसीचे किती डोस मागवले आहेत आणि त्यापैकी किती डोस गेल्या सहा महिन्यांत मिळाले आहेत, याची माहिती केंद्र सरकारने प्रसिद्ध करावी. तसेच करोनाविरोधी औषधे राज्यांना कशी वितरित केली जात आहेत तेही सरकारने सांगायला हवे, असेही मनमोहन सिंग यांनी सुचवले आहे.
भारतात करोनाची साथ वेगाने पसरत असून, दररोज 2 लाख जणांना संसर्ग होत असल्याचे गेल्या चार दिवसांत निष्पन्न झाली आहे.