चेन्नई -लोकेश राहुलला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर भारताच्या कसोटी संघात कसे काय स्थान दिले जाते, असा सवाल संजय मांजरेकर यांनी विचारला होता. त्याचा समाचार घेताना सध्या मांजरेकरला वादग्रस्त विधाने करण्याव्यतिरिक्त दुसरे काम नाही, अशा शब्दांत माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी टोला हाणला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी राहुलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यावर मांजरेकर यांनी टीका केली होती. राहुलने आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, त्यावरून त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करणे योग्य नाही, बीसीसीआय चुकीचा पायंडा पाडत आहे.
तसेच सूर्यकुमार यादवला संघात का घेतले गेले नाही, अशीही विचारणा मांजरेकर यांनी केली होती. त्याचा पुरेपूर समाचार श्रीकांत यांनी घेतला. मांजरेकर मुंबईबाहेरचा विचार करू शकत नाही. त्याला दुसरे काहीही काम नाही.
राहुलच्या टेस्ट टीममध्ये निवड होण्यावर आक्षेप घेतला जातोय? त्याने कसोटीतही चांगली कामगिरी केली आहे. मांजरेकर फक्त वाद निर्माण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतो, असेही श्रीकांत म्हणाले.