इंफाळ – मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा 17वर पोहोचला आहे. या मृतांमध्ये सात जवानांचा समावेश आहे. तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अडकलेल्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून खराब हवामान आणि सातत्याने भूस्खलन सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाजवळ टीएच्या 107 तुकड्यांना तैनात करण्यात आले होते. यावेळी भूस्खलन झाले. भूस्खलन झाल्यानंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सकडून तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. रेल्वेच्या साइट इंजिनिअरिंग प्लांटमधून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
डीजीपी पी डोंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जणाना बाहेर काढण्यात यश आले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. यात लष्कराचे जवान, रेल्वे कर्मचारी, स्थानिक लोक आणि मजुरांसह सुमारे 60 जण अडकल्याची भीती आहे.