इम्फाळ – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मणिपूरमधील बंडखोर संघटनांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आणि केंद्राशी शांतता चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लांगथाबल येथे प्रचारसभेत बोलताना सिंह म्हणाले की, बंडखोर गटांना मुख्य प्रवाहात परतायचे असल्यास केंद्र सरकार त्यांच्याशी संवादासाठी तयार आहे. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यास आम्ही उत्सुक आहोत.
गेल्या पाच वर्षात मणिपुरातील हिंसाचारात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राजनाथसिंह म्हणाले की, बेरोजगारी, गरिबी यामुळे मणिपूरमध्ये वर्षानुवर्षे त्रस्त असलेल्या येथील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अमाचे सरकार वचनबद्ध आहे. मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमत मिळवेल, असा विश्वासही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारांच्या काळात ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर खूप मागे राहिला.
कॉंग्रेसने या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष केले असा आरोपही त्यांनी केला. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर या प्रदेशाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले गेले होते. मात्र, 2004 मध्ये वाजपेयींचे सरकार पराभूत झाल्यानंतर, कॉंग्रेसने या प्रदेशाकडे दुर्लक्ष केले. पुढील 10 वर्षे हा प्रदेश सातत्याने दुर्लक्षित राहिला.2017 मध्ये राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून मणिपूरचा वेगवान विकास झाला आहे. राज्यातील जनतेने भाजपच्या नेतृत्वात विकास आणि सुशासन पाहिले आहे, असा दावाही त्यांनी केला.