नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीच्या काळात म्हणजे सन 2017 साली कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून नीच हा शब्द वापरला होता. त्यावरून त्यावेळी मोठे वादळ उठल्यानंतर अय्यर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. तथापी त्यांनी आता निवडणुकीचा एक टप्पा बाकी असताना पुन्हा या शब्दाचे समर्थन केले आहे. त्यांनी आपल्या एका ब्लॉग मध्ये आपण त्यावेळी वापरलेला शब्दप्रयोग प्राफेटिक ठरला आहे असे विधान केले आहे. म्हणजेच एका अर्थान आपण मोदींना नीच म्हणालो यात काय चुकले असा सवाल त्यांनी अप्रत्यक्ष रित्या करीत या शब्दप्रयोगाचे समर्थन केले आहे.
त्यांच्या या विधानावर भाजपने आजही जोरदार आक्षेप घेत कॉंग्रेसला धारेवर धरले आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा, जीव्हीएल नरसिंहराव आणि भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अय्यर यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला आहे. अय्यर यांनी या लेखात म्हटले आहे की येत्या 24 मे रोजी देशातील जनता मोदींना सत्तेवरून घालवणार आहे.
देशाने त्यांच्या सारखा खोट्या तोंडाचा पंतप्रधान कधीही पाहिला नाही आणि पुन्हाही पाहण्याची इच्छा नाही. 23 मे हा त्यांच्या राजकीय कारकिर्दींच्या अंताचा दिवस असेल. मी त्यांना 7 डिसेंबर 2017 रोजी काय म्हणालो होतो ते आठवतेय का? मी काय चुकीचे बोललो असा सवाल त्यांनी यात केला आहे.