पुणे – करोना विषाणूचा फटका आंबा निर्यातीला बसण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय सिमा लॉक केल्याने आंबा निर्यात करायची कशी, असा प्रश्न निर्यातदार आणि शेतकऱ्यांना पडला आहे. सध्याची परिस्थिती पाहता सगळ्यांनीच “वेट ऍन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
द्राक्षापाठोपाठ महाराष्ट्रातून आंब्याची सर्वाधिक निर्यात होत असते. येत्या पंधरा दिवसांत आंबा निर्यात प्रत्यक्षात सुरू होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्यावतीने वाशी मार्केटमध्ये स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. निर्यात होणाऱ्या आंब्यावर प्रक्रिया करून तो निर्जंतूकीकरण केले जाते. त्याचबरोबर दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेला जाणारा आंबा तपासणीसाठी खास या देशातील फूड इन्स्पेक्टर या काळात भारतात येतात. त्यांच्या देखरेखीखालीच सर्व आंब्याचे पॅकिंग होऊन त्याची निर्यात होत. साधारण 15 मार्चनंतर हे अधिकारी भारतात येतात पण यंदा अद्याप या देशांकडून कुठलाही याबाबतचा पत्रव्यवहार झालेला नाही. याशिवाय युरोप, आखाती देश आणि आशियाई देश यामध्ये सुद्धा आंब्याला चांगली मागणी असते.
आंब्याची निर्यात साधारण 20 मार्चनंतर सुरू होते. एप्रिल आणि मेमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. या मार्चमध्ये शेतकरी निर्यातीसाठी नोंदणी करतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील 7 हजार 996 शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी प्रमाणपत्र घेतले आहे. करोनामुळे या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. निर्यातदार प्रमाणपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडील मालाचे मार्चमध्येच बुकिंग घेत असतो पण सध्या निर्यातदारांनी बुकिंग घेणे बंद केले आहे.
सध्या सगळेच अनिश्चित दिसत आहे. आंब्याच्या निर्यातीवर परिणाम होणार, असे दिसत आहे. अशी स्थिती किती दिवस रहाते यावर सगळे अवलंबून आहे.
– डॉ. विवेक भिडे, कोकणातील आंबा उत्पादन संघाचे अध्यक्ष