चर्चांना उधाण : एक तास बंद खोलीत आढळरावांसमवेत चर्चा
शिक्रापूर – राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्याप्रमाणात “ऑऊटगोइंग’ तर भाजप-शिवसेनेत “इनकमिंग’ सुरू असल्याने यंदा सर्वच मतदारसंघांचे गणित बदलणार असल्याचे चिन्हे आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेलीतील मतदारसंघातील मातब्बर नाव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या वावड्या सध्या उठल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. बांदल यांनी नुकतीच शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेत एक तास बंद खोलीत चर्चा केली असल्यामुळे बांदल लवकरच “शिवबंधना’त अडकणार असल्याची चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शिरूर-हवेलीतील शिवसेना इच्छुकांच्या अपेक्षांना सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांच्यामनात धाकधूक सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या निवडणुका लढविलेल्या असून जिंकल्या देखील आहेत, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मंगलदास बांदल यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत आढळराव पाटील यांना घरी बसविणारच अशी शपथ घेतली होती, तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अचानक त्यांनी रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारास पाठींबा दर्शवून उमेदवार निवडून आणण्याची शपथ घेत उमेदवार निवडून देखील आणला; परंतु मुळात मंगलदास बांदल हे कधी कोणत्या पक्षात राहतील व कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील याबाबत कोणालाही सांगता येणार नाही. दरम्यानबांदल यांनी नुकतीच शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतली; परंतु या भेटी दरम्यान दोघांची काय चर्चा झाली, याबाबत कमालीची गुप्तता बाळगल्याने बांदल शिवसेनेत जाणार या चर्चेंना उधाण आले असून त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा – मंगलदास बांदल
मंगलदास बांदल शिवसेनेत जाणार या चर्चेबाबत बांदल यांच्याशी संपर्क साधला असताना केवळ शिवाजीराव आढळराव यांच्याशीच माझी चर्चा झालेली नसून माझी मुख्यमंत्र्यांसोबत देखील अर्धा तास बातचीत झालेली असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
लॉटरी कोणाला लागणार?
राष्ट्रवादीचे दिग्गज पक्षांतर करत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देऊ, असे सुतोवाच केलेले आहे. शिरूर-हवेली मतदार संघातून माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे तयारीत आहेत तर आंबेगाव-शिरूर मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील उमेदवार ठरलेलेच आहेत; मात्र मंगलदास बांदल यांना शरद पवार यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी शब्द दिला असल्याचे सांगितले असल्याने विधानसभेची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
आमच्या दोघांमध्ये वेगळ्या कारणाने चर्चा झाली असून शरद पवार साहेबांनी मला विधानसभेच्या उमेदवारीबाबत शब्द दिलेला आहे. त्यामुळे पवार यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेणार आहे.
-मंगलदास बांदल, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस