राजगुरूनगर : तालुक्यातील भीमाशंकरकडे जाणाऱ्या शिरगाव-मंदोशी घाटात तीव्र वळणानजीक रस्त्याचा खालचा भाग खचल्याने भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. तसेच तळेघर, उगलेवाडी, बांगरवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे .आज दुपारच्या सुमारास रस्ता खचल्याची घटना घडली आहे.
सलग दोन दिवस भोरगिरी भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पश्चिम भागातील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. भीमाशंकरला जाणाऱ्या मंदोशी घाटात तीव्र चढ व वळण असलेल्या भागाजवळील रस्त्याचे भूस्खलन झाल्याने रस्त्याचा मोठा भाग खाली खचला आहे. यामुळे भीमाशंकर कडे जाणारा रस्ता चार चाकी वाहनांसाठी बंद झाला आहे.
खेड आणि आंबेगाव तालुक्याला जोडणाऱ्या मंदोशी घाटातील रस्ता जवळपास 30 ते 50 फूट खाली खचल्याने वाहतूक बंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास आणि उर्वरित रस्ता खचल्यास भविष्यात हा रस्ता पूर्णतः बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे