प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागते. अशा संकटप्रसंगी जिद्दीने वाटचाल करून यशस्वी होणे सोपे नसते. नाशिकच्या सोनाली शशिकांत भुसे यांनी मोठ्या धैर्याने संकटावर मात करीत केटरिंगचा व्यवसाय यशस्वी केला. त्या स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आणि स्वतःबरोबर इतर महिलांसह पुरूषांनाही त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या या प्रवासात माणदेशी फाउंडेशनने त्यांनी केलेली मदत मोलाची ठरली. जगण्याला दिशा मिळाल्यानंतर त्यांनी मोठ्या हिमतीने केलेली प्रगती इतरांसाठी अनुकरणीय अशीच आहे.
नाशिकमधील जेलरोडच्या शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सोनाली भुसे यांनी कष्टाने केटरिंगचा व्यवसाय वाढवत आपल्या अडचणीत आलेल्या संसाराला मोठा हातभार लावला. सोनाली यांचे लग्न झाल्यावर 2005 मध्ये त्या नाशिकमध्ये आल्या. त्यांचे पती तीन चाकी वाहनाद्वारे मालवाहुतकीचा व्यवसाय करीत होते. व्यवसाय वाढत गेल्याने 2010 मध्ये चारचाकी पिकअप वाहन त्यांनी घेतले. तीन वर्षे चांगला व्यवसाय चालला. पुढे नोटाबंदीच्या काळात मालवाहतुकीचा व्यवसाय कमी होत गेला.
2018 मध्ये चारचाकी वाहन विकावे लागले. उत्पन्न कमी होत गेले. आर्थिक तंगी जाणवू लागली. नेमके काय करायचे, उदरविर्वाह कसा करायचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. परिस्थिती नाजूक बनत चालल्याने पुढे काय, असे वाटत असतानाच माणदेशी फाउंडेशनशी संपर्क आला. माणदेशीच्या सारिका कथले टीमसह सर्व्हे करत असताना माणदेशीची माहिती सोनाली यांना मिळाली. त्यापूर्वी सोनाली यांनी जेवणाचे डबे देण्याचे काम सुरू केले होते. त्यांच्या हाताला चव असल्यामुळे डब्यांमध्ये वाढही होत गेली.
माणदेशीकडून दाक्षिणात्य खाद्यपदार्थ, चिक्की, लाडू असे पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. मेसचे डबे वाढू लागले. पुरणपोळीच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. एखाद्या इव्हेन्टमध्ये डोसा काउंटरवरून दाक्षिणात्य खाद्यपदार्थांची विक्री त्या करू लागल्या. चवीमुळे लोकांचा प्रतिसाद वाढू लागला. व्यवसाय करण्याचा उत्साह वाढत गेला. व्यवसाय वाढविण्यासाठी माणदेशीकडून वेळोवेळी आर्थिक मदतही मिळाली. त्यातून हॉटेल मिक्सर, मोठे इडली पात्र, भांडी, भट्टी घेतली. इव्हेंन्टमधील सहभागाबरोबरच वाढदिवस, जागरण गोंधळ, लग्नातील जेवणाच्या ऑर्डर्स घ्यायला लागल्या. व्यवसायात जम बसू लागला होता. पण करोना काळ सुरू झाला. पुन्हा संकट. लॉकडाऊनमध्ये केटरिंगचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. आर्थिक उत्पन्न बंद झाले. पुन्हा संघर्ष सुरू झाला. काय करावे सुचत नव्हते. अशा वेळी पुन्हा माणदेशी धावून आली. माणदेशीने त्यांना रोज सकाळी व संध्याकाळी जेवणाचे 200 डबे वाटप करण्याची संधी दिली. सोनाली यांनी चिकाटीने ही जबाबदारी पार पाडली. या डब्यांचे पूर्ण बिल त्यांना मिळाले.
अन्नपदार्थांची किंमत, मजुरी, वाहतूक असा सर्व खर्च जाऊन उरलेल्या पैशांतून त्यांनी पाचशे लोकांचा स्वयंपाक होऊ शकेल, असा भांड्यांचा सेट घेतला. केटरिंगचा व्यवसाय मोठ्या नेटाने सुरू करण्याचे ठरविले. अडचणी तर खूप होत्या. त्यातून मार्ग काढत वाटचाल सुरू झाली. मजुरांचा प्रश्न, मार्केटिंग, वाहतूक असे प्रश्न समोर यायचे. पती खंबीरपणे मागे उभे राहिले. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाला. आज त्यांच्याकडे एक चारचाकी व्हॅन आहे. गेल्या जानेवारीत मोठी चारचाकी मालवाहतुकीची गाडी घेतली आहे. आता एक हजार लोकांचा स्वयंपाक करता येऊ शकेल एवढा भांड्यांचा सेटअप त्यांनी उभा केला आहे.
पाच आचाऱ्यांसह 25 महिला, 25 पुरूष अशी त्यांची टीम आता कामासाठी सज्ज असते. आता त्या एक- दोन हजार लोकांच्या स्वयंपाकाच्या ऑर्डर्स घेऊ लागल्या आहेत. रिसॉर्टस्, फाइव्ह स्टार- सेव्हन स्टार हॉटेलमधील लग्नाच्या ऑर्डर्सही त्यांना मिळत आहेत. व्यवसाय जोमाने वाढत आहे. आता व्यवसायाचे हे चित्र दिसत असले तरी त्यामागे सोनाली भुसे यांचे मोठे कष्ट आहेत. पहाटेपासून उठून रात्रीपर्यंत मेहनत घ्यावी लागते. कामाचे नियोजन करावे लागते.
सर्वांकडून काम करून घेताना आपल्या उत्पादनाची चव आणि दर्जा कायम राहिल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा उत्तम दर्जा राखत चांगली सेवा देण्याचे त्यांचे व्रत त्यांना यशाकडे घेऊन जात आहे. त्याशिवाय आपण आर्थिक स्वावलंबी होण्याबरोबरच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची किमया त्यांनी सिद्ध करून दाखवली. कितीही संकटे आली तरी न डगमगता मार्ग शोधून आपण योग्य वाट चालू शकतो, असा संदेश सोनाली भुसे यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
श्रीकांत कात्रे