नवी दिल्ली – इंग्लंडने जारी केलेल्या जाचक प्रवासी नियमानुसार, काही देशांमधून येणाऱ्या नागरिकांना लसीकरण पूर्ण झालेले असले तरी १० दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. क्वारंटाईन रहावे लागणार असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील समावेश करण्यात आल्याने मोठा वादंग झाला. अशातच भारताने आज इंग्लंडला जशास तसे उत्तर दिले आहे.
४ ऑक्टोबरपासून इंग्लंडच्या नागरिकांना भारतात यायचे असल्यास १० दिवसांसाठी क्वारंटाईन होणे सक्तीचे करण्यात आले आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या ब्रिटिश नागरिकांना देखील हे नियम लागू असणार आहेत.
भारत सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार ब्रिटिश नागरिकांना भारतात येण्यासाठी तीन वेळा कोव्हीड चाचणी करावी लागणार आहे. पहिली चाचणी प्रवासाच्या ७२ तासांआधी, दुसरी चाचणी विमानतळावर आल्यानंतर व तिसरी चाचणी भारतात दाखल झाल्याच्या आठव्या दिवशी करावी लागेल. तसेच १० दिवस घरी अथवा हॉटेलमध्ये क्वारंटाईन असम देखील बंधनकारक असणार आहे.
तत्पूर्वी, ब्रिटनने भारताच्या कोव्हीड लसीकरण प्रमाणपत्रावर शंका उपस्थित करत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना देखील इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाईन राहणे सक्तीचे केले होते. इंग्लंडच्या या निर्णयाचा भारताने जोरदार विरोध केला होता. अशातच आता भारत सरकारने देखील ब्रिटिश नागरिकांवर त्याच पद्धतीचे नियम लादून जशास तसे उत्तर दिले आहे.