वाई बाजार समितीच्या दारातील प्रकार; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाई (प्रतिनिधी) – लॉकडाऊन संदर्भातील नियम शिथिल केल्याने दोन दिवसांपासून वाई शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच वाई बाजार समितीच्या दारातच मुख्या रस्त्यावर विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन शिथिल केल्याने करोना हद्दपार झाल्याचा जणू गैरसमजच लोकांमध्ये झाल्याने याठिकाणी येणाऱ्या लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडविला जात आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकरी बांधव व व्यापारी यांच्यासाठी बाजार समितीने काही नियम घालून दिले आहेत, परंतु बाजार समितीच्या दारातच मुख्य रस्त्यावर भरणारी भाजी मंडई ही अपघातास निमंत्रण देणारी ठरु लागली आहे.
बाजार समितीच्या आवारात प्रचंड मोठी जागा मोकळी असताना त्या ठिकाणी भाजीमंडई न भरविता मुख्य रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी भाजीमंडई भरविण्याचा संयोजकांचा घाट योग्य नसून त्वरित यावर निर्णय घेवून रस्त्यावर भरणारी भाजीमंडई मोकळ्या जागेत भरविण्यात यावी, अशी काहीशी मागणी करण्यात येत असून भाजीमंडई विक्रेत्यांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी वाईकर नागरिक करीत आहेत.
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मंडईची वेळ सकाळी पाच वाजता आहे, त्या अगोदर शेतकरी व व्यापाऱ्यांनी कृपया वाई बाजार समितीच्या मुख्य गेटवर गर्दी करु नये, तोंडाला मास्कचा वापर करावा व या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता, बाजार समितीच्या नियमांचे पालन करावे, शेतकरी बंधूंनी शेतमाल विक्री करताना अंतर ठेवून शेतमाल विक्री करावा व तो शेतमाल अंतर ठेवून खरेदी करावा, वाई बाजार समितीने आखून दिलेल्या सीमा रेषाच्या आत शेतमालाची मांडणी करावी, आपसात अंतर ठेवावे, नागरिकांनी नाहक गर्दी करण्याचे टाळावे, असे शंभर नियमावली लावणाऱ्या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व सदस्यांना ही एवढी मोठी गोष्ठ लक्षात येवू नये याचे आश्चर्य वाटत आहे.