मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह (सहकारी) बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केले. याची माहिती मिळताच बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी बँकेबाहेर एकच गर्दी उसळली होती. त्यांना पैसे मिळणार नाहीत, असे सांगून परत पाठवण्यात आले. आमचे पैसे कधी मिळणार ? अशीच चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पसरली होती. दर महिन्याचा घरखर्च, शाळेची फी, औषधी, ईएमआयचा खर्च कसा करायचा, असाच सवाल हजारो ग्राहकांनी अश्रूंना वाट करून देत उपस्थित केला.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजात अनियमितता आढळून आली आहे. बँकेला 2023 आणि 2024या दोन वर्षांत सुमारे 53 कोटींचा तोटा आला आहे. म्हणून आरबीआयने गुरुवार, 13फेब्रुवारी 2025पासून निर्बंध लागू केले. म्हणून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासूनच हजारो ठेवीदारांनी बँकेच्या मुंबईतील शाखेबाहेर मोठी गर्दी केली होती. बँकेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने कर्मचाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार करीत संताप व्यक्त केला. अखेर त्यांना लॉकरमधील दागिने वस्तू काढण्याची परवानगी देण्यात आली.
कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे भाडे आणि इतर महत्त्वाच्या कामांची बिले दिली जातील. ठेवीदारांना क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतचा दावा करता येईल, असे सांगण्यात आले. बँकेच्या मुंबईतील अंधेरी, बांद्रा, बोरिवली, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, गोरेगाव, नरिमन पॉइंट, कांदिवली, मालाड, मुलुंड, सांताक्रूज, वर्सोवा तर नवी मुंबईत नेरूळ आणि ठाणे जिल्ह्यात मीरा रोड, माजिवडे पाचपाखाडी, पालघर जिल्ह्यात वसई-विरारमध्ये, पुण्यात बिबवेवाडी येथे शाखा आहेत. आर्थिक वर्ष 2023मध्ये बँकेला तब्बल 30 कोटी 75 लाख रुपयांचा तोटा झाला होता, तर आर्थिक वर्ष 2024मध्ये बँकेला 22 कोटी 78 लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
काय आहेत निर्बंध ?
१. खातेदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत
२. बँकेला नव्याने कर्ज वाटप करता येणार नाही
३. जुन्या कर्जाला मुदतवाढही देता येणार नाही
४. बँकेला कुठेही गुंतवणूक करता येणार नाही
दोन वर्षांपासून बँकेत गडबड –
गेल्या दोन वर्षांपासून या बँकेत गडबड सुरू झाली होती, हे बँकेने सादर केलेल्या एन्यूल रिपोर्टवरील बँकेचे संचालक मंडळ पाहून समोर येत आहे. बँकेने त्यांच्या वेबसाइटवर जे एन्यूल रिपोर्ट अपलोड केले आहेत. त्यानुसार, 2023 ला सतीश चंदेर हे चेयरमन तर गौरी भानू या व्हाईस चेयरपर्सन होत्या. मात्र, 25 एप्रिल 2023 पासून पुढे बँकेला चेयरमन पदच नव्हते आणि गौरी भानू यांच्याकडे व्हाईस चेयरपर्सन म्हणून सगळा कारभार होता. तर, फेड्रिक डिसोझा, कुरुष पाघडीवाला, मिलन कोठारे, शिवा कथुरिया, विरेन बरोट हे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. मग, गेली दीड ते दोन वर्ष बँकेचे चेयरमनपद रिक्त का होते? हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
सरकारने को ऑपरेटिव्ह बँक मरायला सोडल्या असल्याचे बँक तज्ञ विश्वास उटगी यांचे म्हणणे आहे. ठेवीवरील व्याजावरच बँकेचा नफा असतो. मात्र, या बँकेत कर्जबुडीचे प्रमाण वाढले. संचालक मंडळ भ्रष्टाचारी झाले. बुडीत कर्जाचा टक्का पाच टक्केच्या पुढे जाताच बँक धोक्यात असल्याचे आरबीआय मानते. पण, न्यू इंडिया बँकेत हे प्रमाण 15 टक्क्यांच्या वर गेले असल्याची शक्यता उटगी यांनी व्यक्त केली आहे. याला बँकेतीलच सर्व मंडळ जबाबदार असल्याचा आरोप बँकींग तज्ज्ञ विश्वास ऊटगी यांनी व्यक्त केला आहे.
मॅनेजरने केला 122 कोटींचा घोटाळा –
अशातच या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याने बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे. हितेश हा बँकेचा अकाउंट हेड होता, त्याच्याकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. तसेच जीएसटी आणि टीडीएसबाबत आणि पूर्ण अकाउंट सांभाळण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती. त्याने प्रभादेवी शाखेतून 112 करोड तर गोरेगाव शाखेतून 10 करोड रुपये गायब केल्याची माहिती मिळते आहे. याबाबत बँकेच्यावतीने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेहता बरोबर आणखी ही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली.