कोलकाता – विवाहाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे आपल्याकडे मानले जाते. मात्र हा एक तर्क आहे. प्रत्यक्षात तसे पाहायला कोणी गेलेले नाही. मात्र हा समज बऱ्याच काळापासून प्रचलित तर आहेच व त्यावर श्रध्दाही आहे. इतकेच नव्हे, तर घरच्या मंडळींनी ठरवून लावून दिलेले लग्नही योगाच्या गोष्टी असे म्हणण्याची आपली परंपरा आहे.
मात्र त्याचवेळी योग्य वर किंवा वधू मिळत नाहीत तेव्हा अगोदर नातलगांची किंवा मित्रमंडळींची व नाहीच जमले तर वधू वर सूचक मंडळांची मदत घेतली जाते. काही लोक वर्तमान पत्रांत जाहीरातीही देतात. अशाच एका जाहीरातीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
संबंधित महाशय प. बंगालच्या एका गावात राहतात. ते नियमित योग करतात अन उच्च न्यायालयात प्रॅक्टीसही करतात. घरातली बहुतेक मंडळी वकील आहेत. स्वत:चे घर आणि कुटुंबाची एक कार असल्याचे व स्वत:ची उंची आणि अन्य माहितीही त्यांनी दिली आहे. संभाव्य वधू कशी हवी याच्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
त्यानुसार ती सुंदर असणे अपेक्षितच आहे. ती उंचही असावी. सडपातळ असाव आणि….तिला सोशल मीडियाचे व्यसन नसावे अशी मुख्य अट त्यात घालण्यात आली आहे.
संबंधित महाशयांना हुंडा वगैरे काही नको आहे. त्यांची फक्त सोशल मीडियाला हरकत आहे. आता सोशल मीडियालाच त्यांचा आक्षेप आहे की त्याच्या अतिरेकाला अर्थात व्यसनाला आक्षेप आहे याचे पुरते स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र ही जाहीरात त्याच सोशल मीडियावर सध्या धुमाकुळ घालताना दिसते आहे.
एका आयएएस अधिकाऱ्याने ट्वीटरवर ती जाहीरात शेअर केली आहे. संभाव्य वर आणि वधूंनो आता निवडीचे निकष बदलले असल्याकडे त्यांनी याद्वारे लक्ष वेधले आहे.