पाण्याला दुर्गंधीयुक्त हिरवातवंग
‘उजनी’च्या मरणकळा : अक्षय आखाडे
पुणे – सोलापूर-पुणे तसेच नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या उजनी जलाशयाच्या पाण्यावर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग आल्याने हे पाणी पिण्यासाठी सोडाच, पण हात धुण्यालायक राहिले नाही, असा निर्वाळा गेल्या दोन वर्षांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने दिला आहे.
एकेकाळी स्वच्छ, निर्मळ असलेल्या जलाशयात पुणे परिसरातील सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी, कोणतीही प्रक्रिया न करता थेट उजनी जलाशयात येते. परिणामी, उजनी धरण आता अतिप्रदूषित पाण्याच्या यादीत आले आहे. त्यामुळे उजनीचे सौंदर्य प्रदूषणाने हरवले आहे. दूषित झालेले पाण्यामुळे पाण्यात असणाऱ्या विविध जलचरांचे, अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
असंख्य जलीय परिसंस्था देखील धोक्यात सापडल्या आहेत. “उजनीला जागतिक पर्यटनस्थळ असा वारसा देऊ,’ असे म्हणणारे सरकार मात्र झोपेत असून, उजनीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनस्तरावरून कुठलेच प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. खरं तर शहरातून उजनीत येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे.औद्योगिक वसाहतींना पाणी प्रकिया आणि शुद्धीकरणाचे निर्बंध घालणे आता काळाची गरज बनली आहे. उजनी धरणाच्या पाण्यातील वाढत्या घातक प्रदूषणामुळे उजनीतील जैवविविधतेवर दूरगामी परिणाम होत आहे.
विविध जातींच्या विदेशी पक्ष्यांवर परिणाम
भीमा नदीच्या अथांग पात्रात विविध जातींच्या पक्ष्यांची कायम मोठी रेलचेल असते. त्यामध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीला विदेशी पक्ष्यांचे आगमन हे पक्षी प्रेमींना सुखावणारे असते. त्याचबरोबर अनेक स्थानिक पक्षी देखील उजनी जलाशयावर आपली उपजीविका करत असतात. मात्र, दुर्गंधीयुक्त हिरव्या विषारी पाण्यामुळे उजनी जलाशयाच्या नाजिक असलेला विविध जातीच्या पक्ष्यांचा वावर कमी झाला आहे. हिरव्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर होत असून विदेशी पक्ष्यांची संख्या देखील गेल्या काही वर्षात कमी झालेली आहे.
जलीय परिसंस्थेतील अनेक जीव धोक्यात
जमिनीप्रमाणे पाण्यातही अनेक जलचर परिसंस्था असतात. पाण्यात जीवन जगणाऱ्या अनेक वनस्पती, पाण्याच्या तळाशी राहणारे अनेक जलचर प्राणी, विविध जातींचे मासे, खेकडे, झिंगे, कासव, विविध प्रकारचे साप, बेडूक, शिंपले अशी अनेक जीवजलीयपरिसंस्था अंतर्गत वास्तव्यास आढळून येतात; मात्र प्रदूषित आणि दूषित दुर्गंधीयुक्त हिरवट पाण्यामुळे उजनी जलाशयातील जलीय परिसंस्थादेखील धोक्यात आलेल्या आहेत.
माणसे मेल्यावर जागे होणार का?
उजनी प्रदूषणाबाबत 22 वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे, आवाजदेखील उठवला गेला आहे. दिवसागणिक उजनीचा श्वास घोटत चालला आहे, त्याचा आक्रोश सुरू आहे. उजनीचे पाणी आता मृत झाले आहे. देश व जगातील जलतज्ज्ञांनी उजनीला भेटी दिल्या आहेत. त्यांनी उजनीच्या पाण्याबद्दल अत्यंत नकारात्मक मत व्यक्त केले आहे. तरी सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही, ही खेदाची बाब आहे. प्रदूषणामुळे पाण्यातील जीवजंतू मरू लागले आहेत. आता माणसे मेल्यानंतर सर्वांना जाग येणार का, असा सवाल करण्यात येत आहे.