चंद्रपूर – किमान आठ माणसे आणि 25 हून अधिक जनावरे मारलेल्या आरटी-1 नामक वाघास चंद्रपुर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर सापळा लावून पकडले आहे. या वाघाने मागील जवळपास दोन वर्षे (21 महिने) धुमाकूळ घातला होता. या वाघाला पकडण्याचे सर्व प्रयत्न अनेकदा व्यर्थही गेले होते. चंद्रपुर सर्कलमधील राजुरा वनविभागात हा वाघ दहशत आणि भीतीचे कारण बनून राहिला होता. जानेवारी 2019 पासून या वाघाने किमान आठ मानसे आणि 25 पेक्षा जास्त जनावरे मारल्याचे स्पष्ट झाले होते, अशी माहिती प्रधान वन संरक्षक एन. आर. प्रविण यांनी दिली.
या वाघाला पकडण्यासाठी त्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गात (कॉरिडॉर) अनेकदा पिंजरे लावण्यात आले होते. मात्र, अनेकदा त्याने वन खात्यास गुंगारा दिला होता. अखेरीस या भागातील एका रेल्वेपुलाखाली लावण्यात आलेल्या सापळ्यात तो फसला आणि वन विभागाच्या हाती लागला. त्यानंतर प्राणीतज्ञांची टीम घटनास्थळी आली आणि भूलीच्या इंजेक्शनचा वापर करुन (डार्ट मारुन) या वाघाला बेशुद्ध करण्यात आले. आता चंद्रपुर येथील वन्यजीव पालन केंद्रात या वाघाची काळजी घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.