सोलापूर – सोलापूरसह तीन जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बीड, नगरमार्गे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने 16 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात नऊजणांचा बळी घेतला आहे. तर तिघांना गंभीर जखमी केले आहे. यानंतर प्रशासनाला जाग आली असून नरभक्षक बिबट्याला बेशुध्द करुन पकडणे शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे.
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे सोमवारी सकाळी नरभक्षक बिबट्याने राजेंद्र बारकुंड यांच्या शेतातील ऊसाच्या फडात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगाराच्या मुलीचा बळी घेतला. तिला गंभीर जखमी अवस्थेत करमाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. फुलाबाई हरिचंद कोठले असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात आणखीनच घबराट पसरली आहे.
आतापर्यंत अल्का बडे (रा. जाटवाद, ता. शिरुर), शिलावती दिंडे (रा. मंगळूर, ता. आष्टी) व शिलाबाई भोसले (रा. पारगाव, ता. आष्टी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर अशोक आवटे, कृष्णा आवटे, छबुबाई राठोड, नागनाथ गर्जे, स्वराज भापकर, सुरेखा भोसले, कल्याण फुंदे, जयश्री शिंदे व फुलाबाई हरिचंद कोठले यांचा बिबट्याने बळी घेतला आहे.
हा नरभक्षक बिबट्या घातक ठरू लागल्याने करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी बिबट्याला ठार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे. तसेच माजी आमदार नारायण पाटील यांनी वनमंत्र्यांनाच फोन केला होता. त्यानंतर रविवारी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी त्या बिबट्याला पिंजरा लावून तथा बेशुध्द करुन पकडणे शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे. बिबट्याला ठार करण्यासाठी पुणे व औरंगाबाद प्रादेशिक वन विभागीय कार्यालयाने प्राधिकृत केलेले वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी तथा अन्य व्यक्तींनाच परवानगी असेल, असे काकोडकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नरभक्षक बिबट्याने शेतकरी व शेतमजुरांसह उसतोड कामगारांना शेतात जाणे मुश्किल केले आहे. झाडाआड प्रसंगी झाडावर लपून बसलेला बिबट्या अनेकांना दिसला. तत्पूर्वी, शेतात कामानिमित्त गेल्यानंतर तथा कामावरुन घरी परतताना बिबट्याने हल्ले केले आहेत. परंतु, या नरभक्षक बिबट्याला अद्याप पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही.