घाटाळ (पश्चिम बंगाल) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या राज्यातील जनतेला जय श्रीराम म्हणू देत नाहीत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. भारतात जय श्रीराम म्हणायचे नाही तर मग काय पाकिस्तानात जय श्रीराम म्हणायचे का असा सवालही त्यांनी आज येथील प्रचार सभेत बोलताना केला. पश्चिम बंगाल मध्ये लोकशाहींची पुनर्रप्रस्थापना करण्यासाठी या निवडणूका महत्वाच्या आहेत असा दावा त्यांनी केला. राज्यातील 42 पैकी किमान 23 जागा भाजप जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की भगवान श्रीराम हे भारतीय संकृतीचे प्रतिक आहेत. त्यांचे नाव घेण्यास कोणी अटकाव करू शकतो काय?. ममतांनी याचे उत्तर द्यावे. रामाचे नाव भारतात नाही तर पाकिस्तानात जाऊन घ्यायचे काय असा सवालही त्यांनी ममतांना उद्देशून केला. मोदी सरकारने पश्चिम बंगाल सरकारला गेल्या पाच वर्षात 4 लाख 24 हजार 800 कोटी रूपयांची मदत केली पण ममतांनी हा पैसा गरीबांपर्यंत पोचवलाच नाही असा आरोपही त्यांनी केला.
मनमोहनसिंग सरकारच्या शेवटच्या पाच वर्षांच्या काळात बंगालला केवळ 1 लाख 32 हजार कोटी रूपयांचीच मदत मिळाली होती असे ते म्हणाले. राजीव गांधींवरील टीकेवरून सध्या सारे विरोधक मोदींनी लक्ष करीत आहे त्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की राजिीव गांधी यांच्या काळात बोफोर्स तोफांचा घोटाळा झाला होता असे मोदी म्हणाले आहेत त्यात काय चूक होते असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.