मुंबई – ममतांच्या विजयामुळे देशातील राजकारण बदलू शकते असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
एका स्त्रीने, जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअरवर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल, असे संजय राऊत म्हणाले.
बंगालमध्ये ज्या प्रकारे कृत्रीम वादळ निर्माण केलं गेलं होतं. सरकारी यंत्रणेचा वापर करुन अनेक राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तिथे बसवण्यात आले होते. देशात कोरोनाचे संकट असूनसुद्धा देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तिथे तळ ठोकून बसले होते. या लोकांनी बंगालमध्ये लाखोंच्या सभा घेतल्या. या सगळ्या पोकळ वादळाचा पराभव झाला, असे संजय राऊत म्हणाले.
आपल्याला कोरोनाचा पराभव करायचा होता. मात्र, केंद्र सरकार कोरोनाला वाऱ्यावर सोडून ममतांच्या पराभावासाठी बंगालमध्ये डेरा टाकून बसले होते. पण तसं काही झालं नाही. ममता येथे मोठ्या बहुमताने विजयी झाल्या, असे राऊत म्हणाले.