सिलिगुडी – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच पश्चिम बंगालच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज येथील एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की या राज्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर ममतांचे सरकार या राज्यातून गेले पाहिजे तरच या राज्याचे भले होऊ शकले असे ते म्हणाले.
या राज्यातील या निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचार सभेत बोलताना मोदींनी कॉंग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही टीका केली. ते म्हणाले की लष्करी दलांच्या विशेषाधिकार कायद्यांमध्ये काही बदल करण्याचे जे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे त्यामुळे सुरक्षा दलांची दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाई कमकुवत ठरू शकते. आपली सुरक्षा दले कमकुवत करण्याचा त्यांचा इरादा आहे. सुरक्षा जवानांचे हातपाय बांधुन दहशतवाद्यांना मोकळीक देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की केंद्र सरकारने गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या पण त्यापैकी एकाही योजनेचा लाभ ममतांनी येथील जनतेला मिळू दिला नाही. ममतांनी खोडा घातल्यामुळेच या राज्यातील असंख्य नागरीक या योजनांच्या लाभापासून वंचित राहिले असे ते म्हणाले.