कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये केवळ गावठी बॉम्ब आणि अवैध शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा उद्योग तेजीत आहे. राजकीय हिंसाचाराची संस्कृती भरभराटीस लागणारे बंगाल हे देशातील एकमेव राज्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राजकीय हिंसाचाराचा उद्योग चालवतात, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सोडले.
भाजपकडून सध्या विविध राज्यांत व्हर्च्युअल जनसंवाद सभा घेतल्या जात आहेत. पश्चिम बंगालसाठी घेण्यात आलेल्या तशा प्रकारच्या सभेत बोलताना शहा यांनी ममता आणि त्यांच्या तृणमूल कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली.
स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीसाठी श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. त्या रेल्वेगाड्यांचा उललेख करोना एक्स्प्रेस म्हणून करून ममतांनी स्थलांतरित मजुरांचा अपमान केला. बंगालची जनता ते विसरणार नाही. त्या करोना एक्स्प्रेस ममतांना सत्तेपासून दूर नेतील, असे शहा यांनी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत म्हटले.
पश्चिम बंगालमधील जनतेने डाव्या पक्षांना 34 वर्षे सत्ता दिली. ममतांना 10 वर्षांचा कार्यकाळ दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला संधी द्या. तसे झाल्यास पश्चिम बंगालमध्ये बदल दिसेल, अशा शब्दांत शहा यांनी त्या राज्यातील जनतेला भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
चीन आपल्या भूमीतून केव्हा बाहेर पडणार?-तृणमूल
शहा यांच्यावर तृणमूलकडून पलटवार करण्यात आला. पश्चिम बंगालच्या सत्तेतून तृणमूल बाहेर पडण्याचे स्वप्न शहा पाहात आहेत. मात्र, त्यांनी भारताच्या भूमीतून चीन केव्हा बाहेर पडणार ते सांगावे. करोना संकट आणि अम्फान वादळाचा तडाखा या दुहेरी आव्हानांशी पश्चिम बंगाल झुंजत आहे. अशातही भाजपची मतांची भूक कायम आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूलकडून देण्यात आली.