कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “का’, “एनपीआर’ आणि “एनआरसी’ मागे घेण्याबाबतची मागणी केली. पश्चिम बंगालच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान कोलकात्यात दाखल झाल्यानंतर मोदी आणि बॅनर्जी यांच्यात समक्ष चर्चा झाली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी यांनी स्वतः ही माहिती दिली. या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालू, असे आश्वासन पंतप्रधानांनी आपल्याला दिले असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात “बुलबुल’ चक्रिवादळाने पश्चिम बंगालला तडाखा दिला होता.
त्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने दिलेला निधी अपुरा असल्याचेही बॅनर्जी यांनी या भेटीच्यावेळी पंतप्रधानांना सांगितले. सर्व विरोधकांना वगळून आपण एकटेच “का’ आणि “एनआरसी’ला विरोध करू, अशी ठाम भूमिकाही त्यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केली होती.
मात्र “का’ आणि “एनआरसी’ला एकत्रित विरोध करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 13 जानेवारीला बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचेही बॅनर्जी यांनी ठरवले आहे. बुधवारी झालेल्या “भारत बंद’ दरम्यान कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांनी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यापासून या कायद्याच्या विरोधात ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वतः अनेक मोर्च्यांचे नेतृत्व केले होते. तेंव्हापासून मोदी आणि बॅनर्जी यांच्यातील ही पहिलीच थेट भेट आहे. त्यामुळे या भेटीतील चर्चेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.