कोलकाता – बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपने बाहेरून भाडोत्री गुंड येथे आणले आहेत. ते येथील लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत. अशा गुंडांचा घरातील जी काही भांडीकुंडी हाताला लागतील ती हातात घेऊन त्यांचा खरपूस समाचार घ्या असे आवाहन तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी महिलांना केले आहे. पश्चिम मिदनापुर जिल्ह्यांतील प्रचार सभांमध्ये बोलताना त्यांनी हे आवाहन केले. अधिकारी कुटुंबातील काही जण मतदानाच्या आदल्या रात्री मतदारांना पैसे वाटताना आढळून आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
त्या म्हणाल्या की काल अधिकारी बंधुंपैकी एक जण पैसे वाटत असताना त्याला त्या भागातील महिलांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तेथे भाड्याने आणलेले भाजपचे तीस गुंडही महिलांनी पकडून दिले आहेत. महिलांनी या गुंडांचा असाच समाचार घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या राज्यातील निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपातीपणे चालवण्याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. नंदीग्राम मध्ये 1 एप्रिलला मतदान होत आहे. तेथेही सर्वांनी मिर जाफर यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.