Mamata Banerjee : पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी केली. एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) आणि पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्यात केंद्राने कसूर केल्यामुळेच आज सर्वसामान्यांना या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका बंगाली वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्भवलेल्या संकटानंतर देशात निर्बंध लादण्यापूर्वी केंद्र सरकारने एलपीजी आणि तेलाचा पुरेसा साठा करून ठेवणे आवश्यक होते. मात्र, कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय घाईघाईने निर्णय घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. केंद्राचे लक्ष सध्या केवळ राजकारणावर असून देशातील गंभीर समस्या सोडवण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा दावाही त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला. केंद्र सरकार विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवून मतदारांची नावे वगळण्याचे काम चोखपणे करू शकते, पण देशातील गॅस आणि तेलाच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे त्यांना जमलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. इंधन टंचाईसाठी केंद्राकडे स्पष्ट धोरण नसल्यामुळे देशात काळ्याबाजाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी यावेळी केला. योग्य धोरणात्मक नियोजनाच्या अभावामुळे सामान्यांचे हाल होत असून अप्रत्यक्षपणे साठेबाजांचे फावत असल्याचे त्यांनी नमूद केले.