कोलकाता – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय दुर्दैवी, एकतर्फी, हेतुपुरस्सर आणि पक्षपाती आहे. हा निर्णय भाजपच्या सांगण्यावरूनच घेण्यात आल्याची टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहनही केले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे जर पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी निवडणूक आयोग घेणार का? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आल्या, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही बॅनर्जी यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने त्रयस्थ राहून लोकशाहीचे रक्षण करायला हवे. मात्र निवडणूकीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली, हे अतिशय निषेधार्ह आहे. या बदल्यांचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या उमेदवारांनी कायदा सुव्यवस्थेबाबत टीका केल्यानंतर घेण्यात आल्याची टीकाही बॅनर्जी यांनी केली.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिस आयुक्त आणि बिधानगर पोलिस आयुक्तांना हटवून त्यांच्या जागेवर अन्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक आणि निःपक्ष निवडणूका होणे श्क्य नही, असे विरोधकांनी म्हटले होते.