नवी दिल्ली : येत्या १७ ऑक्टोबर रोजी म्हणजेच सोमवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून सुमारे २५ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अध्यक्ष म्हणून नवीन चेहरा मिळणार आहे. दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर स्वतः सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केला असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चेवर आता खुद्द मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपलं नाव सुचवलं, ही अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी बोलताना खरगे यांनी, “सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव सुचवलं नाही. या सर्व अफवा आहेत. सोनिया गांधींनी माझं नाव सुचवलं असं मी कधीही बोललो नाही. गांधी घराण्यातील कोणीही निवडणुकीत भाग घेणार नाही किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, “असे सोनिया गांधींनी स्पष्टपणे सांगितले असल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.
“काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी आणि माझी बदनामी करण्यासाठी कोणीतरी ही अफवा पसरवली आहे. सोनिया गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्या पक्षाच्या निवडणुकीत भाग घेणार नाही आणि कोणत्याही उमेदवाराला समर्थन देणार नाहीत,” असेही खरगे म्हणाले.
दरम्यान, खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक का लढवत आहे? याबाबतची काही कारणे नुकतीच दिली आहेत. सध्या देशातील स्थिती अतिशय वाईट आहे. या स्थितीशी आपल्याला लढा द्यायचा आहे, त्यामुळे मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. मोदी आणि शाह जे राजकारण करत आहेत, तिथे लोकशाहीला अजिबात स्थान नाही. सीबीआय आणि ईडी सारख्या संस्था कमकुवत होत आहेत. यांच्याशी लढण्यासाठी माझ्याकडे सत्ता असणे आवश्यक आहे. त्यामुळेच शिष्टमंडळाच्या शिफारशीनुसार मी निवडणूक लढत आहे, असे खरगे म्हणाले.