नवी दिल्ली – अदानी प्रकरण म्हणजे महाघोटाळा आहे. ते प्रकरण कॉंग्रेस संसदेत आणि संसदेबाहेरही मांडत राहील, असा इशारा त्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी मोदी सरकारला दिला. लोकशाही मार्गाने कार्य न केल्यास जनता सरकारपासून स्वत:ची सुटका करून घेईल, असेही त्यांनी म्हटले.
खर्गे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सरकारला दहा प्रश्न विचारले. अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) का सोपवली जात नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार संसदेत अदानी हा शब्दही का उच्चारू देत नाही? अदानी प्रकरणाबाबत आरबीआय, सेबी, ईडी, प्राप्तिकर विभाग, सीबीआय डोळे का झाकून आहेत आदी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत करण्याची मागणी विरोधी पक्ष एकमुखाने करत आहेत. देशाला वाचवणे आणि जनसामान्यांच्या गुंतवणुकीचे रक्षण करणे हेच प्रत्येकाचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. खर्गे यांनी ट्विटरवरूनही मोदींवर निशाणा साधला. मित्राचे घोटाळे धुवून काढण्यासाठी मोदी आता संसदेचा वापर वॉशिंग मशिनसारखा करत आहेत, असे ट्विट त्यांनी केले.